नंदेश्वर / प्रतिनिधी : देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा बजावत असलेल्या सैनिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ETPBS (Electronically Transmitted Postal Ballot System) प्रणालीप्रमाणे मतदानाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील भारतीय सैनिक दलातील जवान दत्ता सलगर यांनी केली आहे. दत्ता सलगर हे सध्या हिमाचल प्रदेशमध्ये सुरक्षा कर्तव्य बजावत आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये ETPBS प्रणालीद्वारे मतदानाची सोय
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असून या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी देशसेवेत कार्यरत असलेल्या अनेक सैनिकांना प्रत्यक्ष मतदान करता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये सैनिकांसाठी ETPBS प्रणालीद्वारे मतदानाची सोय उपलब्ध असते, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही सुविधा अद्याप लागू करण्यात आलेली नाही.
सैनिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे योग्य नाही – दत्ता सलगर
दत्ता सलगर यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षेसाठी सीमांवर कार्यरत असलेल्या सैनिकांना सुट्टी घेऊन गावाकडे येणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावता येत नाही. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार महत्त्वाचा असून सैनिकांना त्यापासून वंचित ठेवले जाणे योग्य नाही. ETPBS प्रणालीमुळे सैनिकांना ऑनलाईन पद्धतीने पोस्टल बॅलेट प्राप्त होऊन सुरक्षित व पारदर्शक रीतीने मतदान करता येते. हीच प्रणाली राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील निवडणुकांसाठीही लागू करण्यात यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

हजारो सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घेता येईल सहभाग
या मागणीमुळे राज्यातील तसेच देशभरातील हजारो सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेता येईल आणि लोकशाही अधिक बळकट होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. संबंधित मागणी शासन व राज्य निवडणूक आयोगाने गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.























