नंदेश्वर/ प्रतिनिधी : धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुकारण्यात आलेल्या ‘चलो मुंबई’ आंदोलनाचे नेतृत्व करणारे दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी पहाटे प्रथम नजरकैदेत ठेवून नंतर अटक केल्याच्या निषेधार्थ मंगळवेढा – जत रस्त्यावर नंदेश्वर येथे रास्ता रोको करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नंदेश्वर येथील धनगर समाजाचे युवक नेते अंकुश गरंडे यांनी दिला आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, अभिमान शिंदे, ऐनाथ गरंडे, भाऊसाहेब संतराम गरंडे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि.१८ रोजी सकाळी ठीक नऊ वा. आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अंकुश गरंडे यांनी दिली आहे.
आंदोलन दाबण्याचा सरकारचा प्रयत्न
यावेळी बोलताना गरंडे म्हणाले की, २१ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या भव्य आंदोलनासाठी आज, १७ जानेवारी रोजी जालना–अंबड येथून कूच करण्याचे नियोजन होते. मात्र, आंदोलनापूर्वीच प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत जालना व अंबड तालुक्यात पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू केली.
महाराष्ट्र सरकारचे प्रशासनाच्या आडून दबावतंत्र
दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे दीपक बोऱ्हाडे यांना पहाटे अटक करण्यात आल्याने धनगर समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ही कारवाई म्हणजे धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाच्या मागणीचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप समाजातील नेत्यांकडून करण्यात येत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटत असून, मंगळवेढा तालुक्यातही आंदोलनाची तयारी सुरू आहे. नंदेश्वर येथील युवक नेते अंकुश गरंडे यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, धनगर समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन दडपशाहीने थांबवता येणार नाही. दीपक बोऱ्हाडे यांची तात्काळ सुटका करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी बोलताना अंकुश गरंडे यांनी दिला आहे.























