मंगळवेढा | प्रतिनिधी : साप्ताहिक रणयुग टाईम्स च्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांनी मार्गदर्शन करत पत्रकारितेच्या भूमिकेवर सखोल भाष्य केले. “गेल्या १४ वर्षांत रणयुग टाईम्स ने सत्यनिष्ठ, निर्भीड व संघर्षमय पत्रकारिता करत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून“पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून ती समाजाला दिशा देणारी, चुकांवर बोट ठेवणारी आणि जनतेचा आवाज बनणारी एक सशक्त व्यवस्था आहे,” असे ते म्हणाले.

साप्ताहिक रणयुग टाईम्सच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मंगळवेढा येथील मैत्री लाॅन्स मध्ये आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने होते.यावेळी व्यासपीठावर दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे,दै.सांगोला नगरीचे संपादक सतिश सावंत,दै. राष्ट्रसंचारचे संपादक अनिरूद्ध बडवे,दै.पंतनगरीचे संपादक रजाक मुजावर, रणयुग टाईम्सचे मानद संपादक दिलीप बिनवडे, संपादक प्रमोद बिनवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आ.आवताडे पुढे म्हणाले की, “पत्रकारितेचा प्रवास हा अत्यंत कठीण असतो. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी, आर्थिक मर्यादा, अनुभवाचा अभाव आणि तांत्रिक अडथळे यांचा सामना करावा लागतो. मात्र या सर्व अडचणींवर मात करत सातत्याने काम करत राहणे, चुका मान्य करून त्यातून शिकत पुढे जाणे हेच यशाचे खरे गमक आहे.”या संदर्भात त्यांनी संस्थापक दिलीपदादा बिनवडे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत सांगितले की, त्यांच्या जिद्दीने, प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीनेच रणयुग परिवार उभा राहिला. त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना नम्रता, शिस्त आणि समाजसेवेचे संस्कार दिले, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे.या कार्यक्रमातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हार-तुरे टाळून गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम. या उपक्रमाचे कौतुक करत ते म्हणाले, समाजातून आपण जे काही मिळवतो, ते समाजालाच परत देण्याची भावना अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणासाठी मदत करणे ही सर्वात मोठी सामाजिक सेवा आहे.”पत्रकारितेच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राजकीय किंवा प्रशासकीय पातळीवर काम करताना चुका होऊ शकतात. अशा वेळी पत्रकारांनी निष्पक्षपणे त्या चुका दाखवून देणे गरजेचे आहे. त्यामुळेच व्यवस्थेत सुधारणा होऊन समाजाचा विकास होतो.

माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे बोलताना म्हणाले की,गेल्या १४ वर्षांच्या वाटचालीत ‘रणयुग’ साप्ताहिकाने समाजाशी घट्ट नातं निर्माण करत लोकाभिमुख पत्रकारितेचा आदर्श उभा केला आहे. प्रत्येक पानावर समाजाविषयीची तळमळ, जनमानसाशी जोडलेली भावना आणि सात्विकतेने केलेले कार्य स्पष्टपणे दिसून येते. लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्या अभिरुचीला न्याय देणारे असे साप्ताहिक फार थोड्या वेळा पाहायला मिळते, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.

प्रा. ढोबळे पुढे म्हणाले की, रणयुग हे केवळ बातम्या देणारे माध्यम नाही, तर समाज घडविण्याचे एक प्रभावी व्यासपीठ आहे. गेल्या अनेक वर्षांत या साप्ताहिकाने सामान्य माणसांच्या समस्या मांडल्या, त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
ते म्हणाले, “आजच्या काळात पत्रकारिता केवळ माहितीपुरती मर्यादित न राहता समाजाशी बांधिलकी जपणारी असावी लागते. रणयुगने ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यामुळेच या साप्ताहिकावर वाचकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना राजा माने म्हणाले की,साप्ताहिक रणयुग टाईम्सच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढा येथे अत्यंत उत्साहात व दिमाखात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडियाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजा माने हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या प्रवाहावर सखोल आणि परखड भाष्य करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला रणयुग टाईम्सच्या १४ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडणारे, सामान्य जनतेच्या भावना व्यक्त करणारे आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेच्या बळावर स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या या साप्ताहिकाच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. संघर्ष, सातत्य आणि समाजाशी असलेली बांधिलकी यामुळे रणयुग टाईम्सने अल्पावधीतच वाचकांचा विश्वास संपादन केला असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
यावेळी भविष्यातील दिशा ठरवताना रणयुग टाईम्सला मल्टीमीडिया प्लॅटफॉर्मकडे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. प्रिंट मीडियासोबतच डिजिटल, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करत पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे बोलताना म्हणाले की,रणयुग टाइम्सने गेल्या १४ वर्षांत समाजाभिमुख पत्रकारितेची परंपरा जपली आहे. या साप्ताहिकाने ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन.”शिक्षण क्षेत्रातील आपल्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, परीक्षा परिषदेमार्फत स्कॉलरशिप, शिक्षक पात्रता, शिक्षक बुद्धिमत्ता अभियोग्यता तसेच विविध अकॅडमी परीक्षा मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. दर सहा महिन्यांनी टंकलेखन परीक्षा आयोजित केल्या जात असून, या सर्व परीक्षा विद्यार्थीहित लक्षात घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या जातात असेही त्यांनी सांगितले.
दै.राष्ट्रसंचारचे संपादक अनिरुद्ध बडवे बोलताना म्हणाले की,पत्रकारिता ही समाजातील परिवर्तनाची साक्षीदार असते. “गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात अनेक सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक बदल घडले. या प्रत्येक घडामोडींचे प्रतिबिंब रणयुग टाईम्सने आपल्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले. त्यामुळे लोकांचा या वर्तमानपत्रावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मोठ्या कॉर्पोरेट माध्यमांच्या तुलनेत ग्रामीण वर्तमानपत्रे अजूनही लोकांशी अधिक जवळची आहेत. “स्थानिक संपादक आणि वाचक यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते हीच ग्रामीण पत्रकारितेची खरी ओळख आहे. संपादक थेट लोकांशी जोडलेला असल्यामुळे त्यांच्या समस्या, भावना आणि अपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात. हीच गोष्ट रणयुग टाईम्सच्या यशामागील महत्त्वाची ताकद आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या डिजिटल युगात पत्रकारिता झपाट्याने बदलत असली तरी तिचे मूलभूत मूल्य कायम असल्याचे बडवे यांनी अधोरेखित केले. “तंत्रज्ञान बदलले, माध्यमांचे स्वरूप बदलले, तरी पत्रकारितेचा आत्मा तोच आहे,सत्य मांडणे, समाजाला दिशा देणे आणि परिवर्तनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. रणयुग टाईम्सने या मूल्यांना जपत आपली वाटचाल केली आहे,” असे ते शेवटी म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, गणेश यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष मिसाळ यांनी केले तर आभार संपादक प्रमोद बिनवडे यांनी मानले.























