नंदेश्वर (प्रतिनिधी) : आजपर्यंत धनदांडग्यांना निवडून दिले; मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच प्रलंबित राहिले आहेत. आता एकदा गरिबांच्या पोरांना संधी देऊन पाहा, तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा जामखेडचे नगरसेवक अरुण जाधव यांनी केले. भोसे जिल्हा परिषद गटातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार ॲड. बापूसाहेब मेटकरी यांच्या प्रचारार्थ नंदेश्वर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अरुण जाधव पुढे म्हणाले की, भोसे जिल्हा परिषद गटात खरी लढत ही भाजप आणि बहुजन वंचित आघाडीमध्ये आहे. बहुजन वंचित आघाडीने सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारा, संघर्षातून घडलेला उमेदवार या गटाला दिला आहे. पाणी प्रश्न, विविध समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न, तसेच महापुरुषांच्या जयंती व विचारांचा प्रचार–प्रसार असो, प्रत्येक ठिकाणी बापूसाहेब मेटकरी हे आघाडीवर असलेले कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
यावेळी उमेदवार ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनीही उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी व कोरडवाहू भागातील गावांचे प्रश्न असोत किंवा २४ गावांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठीचा संघर्ष असो, या सर्व लढ्यांमध्ये मी कायम सक्रिय भूमिका घेतली आहे, हे या भागातील जनतेला चांगलेच माहिती आहे.
मंगळवेढा तालुक्यात पूर्वी केवळ नंदेश्वर गावात आणि मंगळवेढा शहरातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत होती. मात्र राष्ट्रीय समाज पक्षात कार्यरत असताना गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी व्हावी यासाठी मी विशेष प्रयत्न केले. समाजाच्या इतिहासाची जपणूक आणि महापुरुषांचे विचार तळागाळात पोहोचवणे हे माझे कायमचे उद्दिष्ट राहिले आहे. मला एकदा संधी द्या. त्या संधीचे मी सोने करीन. तुमचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलो, तर पुन्हा या भागात तोंड दाखवणार नाही, असे ठाम आश्वासन देत बापूसाहेब मेटकरी यांनी मतदारांना साद घातली.























