टीम सोलापूर आजतक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या हक्काचा मतदारसंघ आहे. अनेक उमेदवार तुतारी कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यामुळे उमेदवारीवरून बरेच दिवस पेच होत राहिला. पण इतर उमेदवारांसारखे चल बिचल व इकडे तिकडे न करता अनिल सावंत हे शेवटपर्यंत पक्षाबरोबर प्रामाणिक राहिले म्हणूनच त्यांना खासदार शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे. आणि अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांचा प्रचाराचा शुभारंभ माचनूर तालुका मंगळवेढा येथे सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला यावेळी खासदार मोहिते पाटील बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राहुल शहा, प्रथमेश पाटील, रविकांत पाटील, दत्तात्रय भोसले, रवींद्र पाटील, पंढरपूर शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिभाऊ मुळे, राष्ट्रवादीचे सुभाष भोसले, अण्णा सिरसट, काँग्रेसचे फिरोज मुलाणी, संतोष रंधवे यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
खासदार मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती कोणी केली आहे याचा गौप्यस्फोट मी येत्या काही दिवसात करणार आहे. भालके यांनी उमेदवारी संदर्भात प्रतीक्षा न करता पवार साहेबांचा विश्वासघात करून काँग्रेसची उमेदवारी मिळवली आहे. देशात हुकूमशाही सरकार आले असून महिलांसाठी दिलेले पैसे सरकार दुसऱ्या बाजूने काढून देखील घेत आहे. सगळ्या बाजूने हे सरकार आपली पिळवणूक करत असल्याचे दिसत आहे. राज्यात देशात एवढी महागाई वाढवली आहे. की सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. नुसती घोषणा बाजी करून प्रत्येक समाजाची फसवणूक केली आहे. जाती धर्मात जातीय तेढ निर्माण करून भांडणे लावली जात आहेत. आशा सरकारला पायउतार करून जागा दाखवून देण्याची गरज आहे. सोलापूर जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री अजून दिला नाही. प्रत्येक कार्यालयात टक्केवारी दिल्याशिवाय कामे होत नाहीत. ही कसली हुकूमशाही निर्माण केली आहे. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू आहे हे सर्व रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणावे असे आवाहन देखील त्यांनी केले. सोलापूर जिल्हा हा सहकारावर उभारला आहे. शेतकरी व सभासदांच्या मालकीच्या संस्था निर्माण केल्या. विठ्ठल कारखाना अडचणीत येईल तेव्हा शरद पवार साहेबांनी मदत केली म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला. मंगळवेढा-पंढरपूर ही जागा राष्ट्रवादीची असताना भालके यांनी गद्दारी केली. त्यांना जनता त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. अनिल सावंत एकनिष्ठ राहिले जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अग्रहा खातर अनिल सावंत यांना उमेदवारी मिळाली. 2009 ची चूक जनता आता सुधारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवार अनिल सावंत बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी मला आपली सेवा करण्यासाठी मिळाली आहे. पक्षाने व शरद पवार साहेबांनी व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. मी कायम जनतेत मिसळून काम करणार आहे. मी कुणावरही टीका करणार नाही, मी विकास करून दाखवणारा आहे, मी माझ्या कामातून विजयी मिळवून विजयाचा गुलाल घेऊनच मुंबईला व बारामतीला जाईल. महिलांसाठी सर्व योजना व उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काळात मोठा प्रकल्प सुरू करणार असल्याचे जाहीर केले. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व गावातील अडीअडचणी जाणून त्या अडचणी सोडवून विकास करण्यासाठी मला संधी द्या असे आवाहन सावंत यांनी केले.
लक्ष्मण ढोबळे बोलताना म्हणाले की, तीन हजार रुपये कोटीचा निधी मतदार संघात आला आहे तर कामे कुठे कुठे झाली आहेत याची माहिती द्यावी, डिजिटल बोर्ड लावावे. आता आजी आमदार यांना माजी करून घरी बसवावे असे आवाहन माजी मंत्री ढोबळे यांनी केले. सर्वसामान्य जनतेला आमदाराची भेट होत नाही असा हल्लाबोल देखील केला.
राहुल शहा बोलताना म्हणाले की, सर्वांना विश्वासात घेऊन अनिल दादा सावंत यांना उमेदवारी दिली. पूर्वीपासून हा मतदारसंघ शरद पवार यांना मानणार आहे. या दोन्ही तालुक्यात मोठ्या मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे.
प्रास्तावित शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, यांनी मांडले सूत्रसंचालन शाम गोगाव यांनी केले.























