मंगळवेढा / प्रतिनिधी : पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकारणात सध्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांच्या भूमिकेबाबत मोठी चर्चा रंगत आहे. गत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधारी शिवसेना पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतरही “जिथे पराभव तिथूनच नव्याने सुरुवात” या भूमिकेतून त्यांनी मतदारसंघात सक्रिय राहून सक्षम विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडली.

निवडणुकीनंतर अनिल सावंत यांनी मतदारसंघातील जनतेशी संपर्क कायम ठेवत विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला. अनेक वेळा स्वतःच्या खिशाला कात्री लावत स्थानिक पातळीवर विकासकामे, मदतकार्य आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. विशेषतः मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले.
मात्र त्यांच्या या कामाची दखल पक्षाकडून अपेक्षित प्रमाणात घेतली गेली नसल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. मंगळवेढा तालुकाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याची चर्चा रंगली. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही त्यांना डावलून उमेदवार निवडीच्या बैठका घेण्यात आल्याचे बोलले जाते. त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली.

गत विधानसभा निवडणुकीत अनिल सावंत आणि भगीरथ भालके हे दोघेही राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. उमेदवारीच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींमुळे दोघांनाही एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवावी लागली आणि परिणामी दोघांचाही पराभव झाला. या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतर अनिल सावंत यांनी जाहीरपणे खंत व्यक्त करत, “दोघांपैकी एकच उमेदवार असायला हवा होता; पक्षाच्या आदेशामुळे नाईलाजास्तव निवडणूक लढवावी लागली,” असे स्पष्ट मत मांडले होते.
राजकारणातील कटु अनुभव असूनही अनिल सावंत यांनी वैयक्तिक पातळीवर मोठेपणा दाखवला. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांच्या पत्नी तथा विद्यमान नगराध्यक्षा प्रणिता भालके यांना त्यांनी सक्रिय मदत केली. त्याचप्रमाणे भोसे जिल्हा परिषद गटात स्वतः इच्छुक असूनही सर्वांच्या विनंतीला मान देत त्यांनी माघार घेतली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रामाणिक प्रचार केला. निवडणुकीनंतर मात्र या गटात जर अनिल सावंत उमेदवार असते, तर भाजपला विजय मिळाला नसता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर झाली. या सर्व घटनांमुळे अनिल सावंत यांच्या संघटन कौशल्याची आणि जनाधाराची पुन्हा एकदा प्रचिती आली.
एकूणच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रामाणिकपणे काम करूनही अपेक्षित मान-सन्मान न मिळाल्याची भावना सावंत समर्थकांमध्ये तीव्र होत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, अनिल सावंत यांनी पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतावे, असा दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. पंढरपूर–मंगळवेढा मतदारसंघातील पुढील राजकीय समीकरणे काय वळण घेणार, अनिल सावंत पुढे कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























