सोलापूर आजतक स्पेशल✍️✍️✍️
मंगळवेढा तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्या वाढत्या राजकीय समन्वयामुळे तसेच नुकत्याच झालेल्या मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या मातोश्री सुनंदा आवताडे यांनी नगराध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवल्यामुळे तालुक्यात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
भगीरथ भालके-अनिल सावंत युतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
गत विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके आणि अनिल सावंत हे दोघेही एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र या निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून एकच भूमिका वारंवार मांडली जात होती. दोघांनीही परस्परविरोधात निवडणूक न लढवता, एकाने माघार घेऊन दुसऱ्याला सहकार्य करावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र ही भूमिका प्रत्यक्षात न आल्याने मतांची फूट झाली आणि त्याचा थेट फटका दोन्ही नेत्यांना बसला. परिणामी दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.
विधानसभा निवडणुकीनंतर या परिस्थितीचे आत्मपरीक्षण दोन्ही नेत्यांनी केल्याचे चित्र पुढील राजकीय घडामोडींमधून स्पष्ट झाले. नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत या बदललेल्या भूमिकेचा ठळक प्रत्यय आला. भगीरथ भालके यांच्या पत्नी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता भालके यांना अनिल सावंत यांनी जाहीर पाठिंबा देत सक्रिय सहकार्य केले. डॉ. प्रणिता भालके यांनी नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळविला.

एकत्र आल्याने ताकद वाढते
अनिल सावंत यांनी भगीरथ भालके यांना दिलेल्या मदतीमुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “एकत्र आलो तर ताकद वाढते” ही भावना कार्यकर्त्यांमध्ये अधिक बळावली आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. मंगळवेढा तालुक्यात भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांची युती कायम राहिल्यास आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपसमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दोन्ही नेत्यांचा ग्रामीण भागातील प्रभाव कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि यांना मिळाली सिद्धेश्वर आवताडे यांच्या कार्यकर्त्यांची ताकद लक्षात घेता ही युती तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. आगामी काळात ही युती औपचारिक स्वरूप धारण करते का, आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोणती रणनिती आखली जाते, याकडे मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.























