नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथील वनपरिक्षेत्रातील वनराईला गुरुवार दि. ४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. पहाटेच्या वेळी वनक्षेत्रातून आगीचे प्रचंड लोट आणि धुराचे ढग आकाशात पसरताना दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्यामुळे अनेक वृक्ष जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे.
जाळरेषा नसल्यामुळे आग आटोक्यात आली नाही
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वनक्षेत्र हे वनविभागाच्या अखत्यारीत येते. मात्र या भागात अंतर्गत जाळरेषा (फायर लाईन) नसल्यामुळे आग वेगाने पसरल्याचे दिसून आले. आपत्कालीन परिस्थितीत आग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा व पूर्वतयारी नसल्याची बाब यावेळी पुन्हा एकदा समोर आली आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, यापूर्वीही या वनक्षेत्रात अनेक वेळा आग लागून मोठ्या प्रमाणात वृक्षांचे नुकसान झाले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप वृक्षप्रेमी व ग्रामस्थांनी केला आहे. “दरवर्षी आग लागते, झाडे जळतात; पण प्रतिबंधात्मक उपाय मात्र दिसत नाहीत,” अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.
या आगीत वन्यजीवांचेही मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगीमुळे वनराईतील पशुपक्षी सैरावैरा पळताना दिसून आले. अनेक लहान प्राणी व पक्ष्यांची घरटी नष्ट झाली असावीत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वनक्षेत्रात तातडीने जाळरेषा तयार करणे, नियमित गस्त वाढविणे आणि तसेच जबाबदार कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























