नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती दादासाहेब रामा गरंडे यांचे गुरुवार, दिनांक ५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. त्यांच्या निधनाने मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दादासाहेब गरंडे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा संपूर्ण नंदेश्वर गावातून काढण्यात आली. अंत्ययात्रेदरम्यान गावातील प्रत्येक चौकात, प्रमुख मार्गांवर आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मोठ्या भावनिक वातावरणात पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.’ दादासाहेब अमर रहें ‘ अशा घोषणांनी परिसर भारावून गेला होता. अत्यंत दुःखद आणि अश्रूंनी भरलेल्या वातावरणात दादासाहेब गरंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, शेतकरी, व्यापारी तसेच विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादासाहेब गरंडे यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्य नागरिकांशी असलेला त्यांचा जिव्हाळा आणि नेतृत्वगुण यामुळे ते सर्व स्तरांत लोकप्रिय होते.

यावेळी मंगळवेढा तालुक्यातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नेते मंडळी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी दादासाहेब गरंडे यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
दादासाहेब गरंडे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक दशके लोकसेवेसाठी वाहून घेतली. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि दुर्मीळ असा होता. त्यांनी पाच वर्षे सरपंच, पाच वर्षे उपसरपंच तसेच पाच वर्षे उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली. विशेष म्हणजे त्यांचे नेतृत्व केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता पुढील पिढीपर्यंत पोहोचले. त्यांच्या मुलाने पाच वर्षे सरपंचपद भूषवले, पत्नीनेही पाच वर्षे सरपंच म्हणून कार्य केले, तर सुनेने पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. एवढा मोठा आणि सातत्यपूर्ण राजकीय प्रवास मंगळवेढा तालुक्यातील मोजक्याच कुटुंबांना अनुभवता आला आहे. दादासाहेब गरंडे हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आग्रही राहिले. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची ओळख होती. विरोधकांशीही सुसंवाद ठेवून त्यांनी राजकारणात सुसंस्कृत परंपरा जपली.

त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. दादासाहेब रामा गरंडे यांचे निधन म्हणजे केवळ एका व्यक्तीचे नाही, तर अनुभव, नेतृत्व आणि लोकांशी नाळ जोडणाऱ्या राजकारणाचे नुकसान आहे. त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत सर्व स्तरांतून भावना व्यक्त होत आहेत.
























