सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी अनिल सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. व्हा. चेअरमनपदी विक्रम सावंत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे उद्योग समूहाच्या पुढील वाटचालीला नवचैतन्य लाभणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील अग्रगण्य उद्योग समूह..
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाची स्थापना राज्याचे माजी आरोग्य मंत्री आमदार तानाजी सावंत आणि प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केली होती. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कष्टामुळे हा उद्योग समूह केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित न राहता, विविध क्षेत्रांमध्ये आपली ठसा उमटवणारा मोठा औद्योगिक समूह म्हणून उदयास आला आहे. आज या समूहाअंतर्गत पाच साखर कारखान्यांसह इतर अनेक मोठे उद्योग कार्यरत असून, राज्यातील हजारो शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात स्थैर्य आणण्याचे मोलाचे कार्य हा समूह करत आहे.
नेतृत्वगुण आणि दूरदृष्टी..
चेअरमन अनिल सावंत हे उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रात अनुभवसंपन्न असून, त्यांचे नेतृत्वगुण व दूरदृष्टीमुळे उद्योग समूहाची प्रगती अधिक वेगाने होईल, अशी आशा समूहातील कर्मचाऱ्यांसह हितचिंतकांनी व्यक्त केली आहे. भविष्यातील औद्योगिक धोरणे आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने हे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार असल्याने, उद्योग वर्तुळात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.
