नंदेश्वर / बाबासाहेब सासणे : मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भोसे गटातील लढत अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरली. या गटात भारतीय जनता पक्ष भाजपकडून प्रदीप खांडेकर तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. अखेरच्या टप्प्यात झालेल्या चुरशीच्या मुकाबल्यात प्रदीप खांडेकर यांनी बसवराज पाटील यांच्यावर विजय मिळवत भाजपचा झेंडा फडकावला.
निवडणूक जाहीर होताच भोसे गटात जातीय समीकरणांची चर्चा रंगू लागली. या गटात धनगर समाजाचे सुमारे १५ हजारांहून अधिक मतदान असल्याने उमेदवारी जाहीर करताना पक्ष नेतृत्व आणि इच्छुक उमेदवारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. धनगर समाजानंतर मराठा समाजाचे सुमारे सहा हजार तर लिंगायत समाजाचे सुमारे पाच हजार मतदार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गजांनी संभाव्य जातीय गणितांचा विचार करून निवडणूक लढविण्यापासून माघार घेतल्याची चर्चा होती. मात्र लिंगायत समाजाचे बसवराज पाटील यांनी कोणत्याही जातीय समीकरणांचा बाऊ न करता आत्मविश्वासाने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. तुलनेने कमी मतसंख्या असतानाही त्यांनी आक्रमक आणि संघटित प्रचारयोजना राबवली.
भाजप उमेदवार प्रदीप खांडेकर यांच्या प्रचारार्थ आमदार समाधान आवताडे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जोरदार सभा, बैठका आणि संपर्क मोहीम राबवली. पक्षयंत्रणा पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे चित्र होते. दुसरीकडे बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार प्रणिती शिंदे, भगीरथ भालके तसेच भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी प्रयत्न केले. प्रारंभी प्रचारात रंग भरला असला तरी नंतर स्थानिक पातळीवर पाटील यांना मोठ्या प्रमाणात एकहाती लढत द्यावी लागली होती.
धनगर समाजाच्या तुलनेत लिंगायत समाजाची मतसंख्या कमी असतानाही बसवराज पाटील यांनी शेवटपर्यंत झुंज देत निवडणूक रंगतदार केली. त्यांनी गावागावांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. जातीय गणितांपेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर भर देत त्यांनी मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. अखेर विजयाचा मान प्रदीप खांडेकर यांना मिळाला असला तरी बसवराज पाटील यांनी दिलेली एकाकी आणि जिद्दी लढत भोसे गटासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कायम स्मरणात राहील, अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.
या निवडणुकीने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, स्थानिक राजकारणात जातीय समीकरणे प्रभावी असली तरी वैयक्तिक संपर्क, जिद्द आणि नेतृत्वगुण यांनाही तितकेच महत्त्व आहे. भोसे गटातील ही लढत आगामी राजकीय समीकरणांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.























