भोसे / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न सोडवून या भागात खऱ्या अर्थाने विकासाची तुतारी वाजविण्यासाठीच आपण निवडणुकीच्या रणांगणात उतरलो असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धेश्वर रणे यांनी केले. भोसे जिल्हा परिषद गट हा मंगळवेढा तालुक्यातील एकमेव असा गट आहे, ज्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. मात्र, एवढी महत्त्वाची पदे मिळूनही या गटातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, वीज, शेतीसाठी पाणी आदी अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले आहेत, ही खंतही त्यांनी व्यक्त केली.

वर्षानुवर्षे सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित
रणे पुढे म्हणाले की, या गटामधून आतापर्यंत अनेक उमेदवार निवडून गेले. काहींनी जिल्हा परिषद गटाचे तर काहींनी वैयक्तिक स्वार्थाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जैसे थेच राहिले. खोटे आश्वासन देऊन जनतेला वेड्यात काढण्याची जी जुनी प्रथा आहे, ती आता मोडीत काढण्याची वेळ आली आहे. केवळ पदासाठी नाही तर भोसे गटातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे, असे ठाम मत त्यांनी मांडले.

लोकप्रतिनिधी केवळ नावापुरता नसावा
भोसे गटातील शेती, पाणीटंचाई, तरुणांसाठी रोजगार, महिला व बचतगटांचे सक्षमीकरण, शाळा व आरोग्य केंद्रांची दुरवस्था या प्रश्नांवर ठोस आणि कालबद्ध उपाययोजना राबविण्याचा निर्धारही रणे यांनी यावेळी व्यक्त केला. लोकप्रतिनिधी हा केवळ नावापुरता नसावा, तर तो जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा असावा,असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विचारधारेनुसार विकास, सामाजिक न्याय आणि पारदर्शक कारभार हेच आपल्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असल्याचे सांगत, भोसे जिल्हा परिषद गटातील मतदारांनी परिवर्तनासाठी संधी द्यावी, असे आवाहनही सिद्धेश्वर रणे यांनी केले.























