रांजणी / विशेष प्रतिनिधी : माढा तालुक्यातील रांजणी पंचायत समिती गणातून वैशाली दादासो कळसाईत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या उमेदवारीमुळे या गणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेदवारी – वैशाली कळसाईत
रांजणी पंचायत समिती गणात भिमानगर, रांजणी, आलेगाव (खु.), रुई आलेगाव (बु.), गारा, खुले, टाकळी, चांदज, आडेगाव आणि वडवली या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांतील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळावा, विकासाची कामे पारदर्शक पद्धतीने व्हावीत आणि प्रशासन जनतेच्या अधिक जवळ जावे, यासाठी आपण ही निवडणूक लढवीत असल्याचे वैशाली कळसाईत यांनी सांगितले.
सर्वसामान्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीला सामोरे
वैशाली कळसाईत यांचे पती दादासाहेब कळसाईत हे माढा तालुक्याच्या राजकारणात संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. दादासाहेब कळसाईत आणि वैशाली कळसाईत यांनी आजपर्यंत अनेकवेळा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवला असून, अनेक प्रकरणांत सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेत सर्वसामान्य नागरिकांच्या आग्रहातूनच वैशाली कळसाईत यांची उमेदवारी पुढे आल्याचे बोलले जात आहे.
टाकळी (टें) ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व
स्थानिक स्वराज्य संस्थांतील कामकाजाचा चांगला अनुभवही वैशाली कळसाईत यांच्याकडे आहे. टाकळी (टें.) ग्रामपंचायतीत त्या सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या असून, सध्या त्या टाकळी (टें.) ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांचे प्रश्न, तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यास कटिबद्ध
जनतेशी थेट संपर्क, प्रामाणिकपणा आणि काम करण्याची इच्छाशक्ती हीच माझी ताकद आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,असे मत वैशाली कळसाईत यांनी व्यक्त केले. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असल्या तरी सर्वसामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि स्थानिक पातळीवरील अनुभव यामुळे वैशाली कळसाईत यांची उमेदवारी रांजणी पंचायत समिती गणात लक्षवेधी ठरत आहे. आगामी निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.























