सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
भोसे जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्षीय राजकारण, गटबाजी आणि सत्तेसाठीची चढाओढ यामध्ये काही नेहमीचे चेहरे पुन्हा दिसू लागले आहेत. मात्र यावेळी सामान्य मतदारांच्या मनात एक ठोस विचार पक्कं होताना दिसतोय त्यामुळे आता जुने चेहरे नकोत… नवीन चेहरे हवेत असे मत भोसे जिल्हा परिषद गटातील सुशिक्षित मतदार नंदेश्वरचे सुपुत्र दादासाहेब मळगे यांनी व्यक्त केले आहे.
विश्वासाला तडा गेला…
गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मतदारांनी काही ठराविक मंडळींवर विश्वास टाकला. त्यांना संधी दिली, सत्ता दिली, जबाबदारी दिली. पण दुर्दैवाने या विश्वासाला फार वेळा तडा गेला. विकासकामांचा गती मंदावला. रस्त्यांची झालेली दुरवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधांची कमतरता, शाळांची खालावलेली गुणवत्ता, आणि अजूनही अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा टंचाई – ही आजची वस्तुस्थिती आहे. ही स्थिती केवळ अपयशी कारभाराची नाही, तर बेजबाबदार लोकप्रतिनिधींची साक्ष आहे.

जनतेची जोडलेला, कार्यक्षम आणि पारदर्शक उमेदवार हवा…
आजचा मतदार अधिक जागरूक, विचारशील आणि कृतीशील आहे. तो आता फक्त वचने किंवा भावनिक भाषणांवर न पडता, काम करणाऱ्या उमेदवाराला शोधतो आहे. भोसे गटातही हीच हवा जाणवत आहे. गावागावात चर्चा सुरू आहे की – आता नातेवाईक, भावकी, जातीपातीच्या आधारे उमेदवार नकोत. असे उमेदवार हवेत जे निष्पक्ष, जनतेशी थेट जोडलेले, कार्यक्षम आणि पारदर्शक असतील.
प्रत्येक क्षेत्रात काम करणारा अभ्यासू उमेदवार हवा…
भोसे गटातील विविध गावांमध्ये काम करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांची नावे चर्चेत आहेत. काहींनी गावात स्वच्छता मोहीमा राबवल्या, तर काहींनी पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर आवाज उठवला. अनेकांनी आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात कामं केली. हे सगळे कार्यकर्ते भले राजकीय दृष्ट्या नवखे असतील, पण सामाजिक भान आणि लोकांप्रती असलेली बांधिलकी त्यांना खऱ्या अर्थाने “जनतेचे प्रतिनिधी” बनवते. ही वेळ आहे पक्षांनी आणि नेत्यांनी जागे होण्याची. जुना फॉर्म्युला – तोच उमेदवार, तोच गावकीचा प्रभाव, तीच जात, तीच भावकी – पुन्हा पुन्हा वापरल्यास मतदार यावेळी स्पष्ट नकार देईल. लोकांना विकास हवा आहे, आणि तो केवळ झगमगाटातून नाही, तर भूमिकेतील प्रामाणिकतेतून शक्य आहे.

या निवडणुकीत कोणते चेहरे पुढे येतील, कोणाला संधी दिली जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे – मतदार बदलासाठी तयार आहेत. प्रश्न इतकाच आहे की पक्ष आणि नेतेही तयार आहेत का? भोसे जिल्हा परिषद गटासाठी ही वेळ आहे नव्या पर्वाची, नव्या नेतृत्वाची, आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची.
श्री. दादासाहेब भगवान मळगे
(सामान्य, सुशिक्षित मतदार, भोसे गट)






















