नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. या विहिरीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, ही विहीर अत्यंत जुन्या अवस्थेत असून तिच्या भोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नाही. या विहिरीच्या अगदी लगतून श्री बाळकृष्ण विद्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता जात असल्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या रस्त्याचे सध्या राज्य महामार्गामध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याचे रुंदीकरण करताना साईड पट्टी थेट विहिरीच्या भागात जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ही विहीर अधिकच धोकादायक बनली असून, रस्त्यावरील वाहतुकीलाही धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा याबाबत लक्ष वेधले असून, विहीर तातडीने बुजवून सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, नागरिकांची वाहतूक आणि भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ही कारवाई अत्यंत आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

या गंभीर विषयावर ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी आणि पुढील निर्णय प्रक्रियेसाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावली आहे. या ग्रामसभेत विहीर बुजविण्या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.























