सोलापूर आजतक स्पेशल ✍️ ✍️ ✍️
मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या भोसे जिल्हा परिषद गटात निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपकडून माजी सभापती प्रदीप खांडेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून त्यांनी प्रत्यक्ष प्रचारालाही सुरुवात केली आहे. गावोगावी गाठीभेटी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि मतदारांशी थेट संपर्क वाढवत खांडेकर यांनी भोसे गटात आपली भक्कम उपस्थिती दाखवून दिली आहे. भाजपकडून उमेदवारी स्पष्ट झाल्याने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली असली, तरी विरोधी गटाकडून अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विरोधी आघाडी कोणता चेहरा मैदानात उतरवणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.

विरोधी गटात पाच नावांची जोरदार चर्चा
विरोधी आघाडीकडून अधिकृत घोषणा नसली, तरी खालील पाच नावे चर्चेत आहेत. भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांचे सुपुत्र दादासाहेब दोलतडे, काँग्रेसचे प्रदेश सचिव रविकिरण कोळेकर ही सर्वच नावे सामाजिक, सहकारी व राजकीय क्षेत्रात प्रभावशाली मानली जात असून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. मात्र अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संयमी नेतृत्वाचा भाजपचा डाव
प्रदीप खांडेकर हे संयमी स्वभाव, सर्वसामान्यांशी थेट संपर्क आणि प्रशासनाचा अनुभव असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. माजी सभापती म्हणून केलेली कामे, सहकारी संस्थांमधील सक्रिय सहभाग आणि स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात ताकदीचा,सर्वसमावेशक उमेदवार देण्याचे आव्हान विरोधी गटासमोर आहे.
जातीय व राजकीय समीकरणे निर्णायक
भोसे जिल्हा परिषद गटात जातीय समीकरणे, स्थानिक प्रश्न, आणि जनसंपर्कातला चेहरा या बाबी निर्णायक ठरणार आहेत. भोसे जिल्हा परिषद गटात प्रामुख्याने धनगर, मराठा आणि लिंगायत या तीन जातींचे प्राबल्य आहे. साधारणपणे 44 हजार लोकसंख्या असलेल्या भोसे जिल्हा परिषद गटात धनगर समाजाचे जवळपास 18 हजार इतके मतदार आहेत. त्यामुळे धनगर समाजाचे प्राबल्य असणारा जिल्हा परिषद गट असे या जिल्हा परिषद गटाची ओळख आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या गटाकडून प्रदीप खांडेकर यांच्यासारखा संपर्कातला आणि धनगर समाजाचा उमेदवार दिला असल्यामुळे घाईने निर्णय न घेता सर्व घटकांचा विचार करूनच उमेदवार देण्याचे विरोधकांसमोर आव्हान आहे.























