नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. खड्डेमय झालेल्या या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. अखेर नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांनी पुढाकार घेतला. गरंडे यांनी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता नंदेश्वर ते वाणीचिंचाळे हा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता स्वखर्चातून दुरुस्त करून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला. शेतकरी, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने दुरुस्तीमुळे वाहतुकीची मोठी सोय झाली आहे.
या रस्त्याचे काम पूर्ण होताच बापूसाहेब गरंडे यांनी सामाजिक कार्याची हीच भूमिका पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. नंदेश्वर ते घेरडी या रस्त्याचीही स्वखर्चातून दुरुस्ती करण्याचा संकल्प त्यांनी केला असून, या कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. या कामाचे उद्घाटन श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, वसंत बंडगर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
नंदेश्वर-वाणीचिंचाळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच नंदेश्वर-घेरडी रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांमधून गरंडे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. गावातील मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केवळ मागण्या न करता प्रत्यक्ष कृती करण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
ग्रामीण भागातील रस्ते हे शेतकरी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. शेतीमाल बाजारपेठेत नेणे, शाळा-महाविद्यालयात जाणे, दवाखाना अथवा इतर कामांसाठी प्रवास करणे यासाठी या रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था नागरिकांसाठी मोठी समस्या ठरते. अशा परिस्थितीत स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेऊन गरंडे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. गावातील नागरिकांची अडचण हीच आपली अडचण समजून त्यावर शक्य तेवढ्या पातळीवर प्रत्यक्ष काम केले पाहिजे,” या भावनेतून गरंडे यांनी हे काम हाती घेतल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
नंदेश्वर-वाणीचिंचाळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता नंदेश्वर-घेरडी रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे शेतकरी, विद्यार्थी, वाहनचालक आणि ग्रामस्थांच्या प्रवासाची मोठी सोय होणार आहे. बापूसाहेब गरंडे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे नंदेश्वरसह परिसरातील ग्रामस्थांनी स्वागत केले असून, स्वखर्चातून रस्ते दुरुस्ती करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.























