नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी नागरिकांची सातत्याने मागणी होती. मात्र, शासकीय यंत्रणेकडून दुरुस्तीला विलंब होत असल्याने अखेर नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांनी पुढाकार घेत हा संपूर्ण रस्ता स्वखर्चातून दुरुस्त करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.

या दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना माजी तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माजी सरपंच वसंत गरंडे, वसंत बंडगर, मधुकर गरंडे, धाडस ग्रुपचे अध्यक्ष अंकुश गरंडे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू बंडगर, युवक नेते वसंत गरंडे, चेतना पतसंस्थेचे व्हा.चेअरमन लखन गरंडे यांच्यासह नंदेश्वर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय मदतीची वाट न पाहता स्वखर्चातून केली दुरुस्ती
नंदेश्वर ते वाणीचिंचाळे हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने आणि रस्ता खराब झाल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. विशेषतः पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडत होती. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन बापूसाहेब गरंडे यांनी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतःच्या खर्चातून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. तब्बल दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती करून त्यांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
सर्व स्तरातून कौतुक
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बापूसाहेब गरंडे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. केवळ आश्वासनांवर न थांबता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्या स्वतःच्या खर्चातून सोडविण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सामाजिक कार्याची परंपरा जपत बापूसाहेब गरंडे यांनी केलेल्या या उपक्रमाचे नंदेश्वरसह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
नंदेश्वर गावाच्या जडणघडणीत गरंडे कुटुंबीयांचे योगदान
माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांचे कनिष्ठ बंधू युवक नेते वसंत गरंडे यांनी याआधी नंदेश्वर येथील हातपंपाची दुरुस्ती स्वखर्चाने केली होती. यावेळी या आठवणींना ग्रामस्थांच्या वतीने उजाळा देण्यात आला. तसेच धाडस ग्रुपचे अध्यक्ष अंकुश गरंडे हे देखील नंदेश्वर गावच्या सामाजिक कार्यात व तसेच राजकारणात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळे संपूर्ण गरंडे परिवाराचे नंदेश्वर गावच्या सामाजिक कार्यात राजकारणात मोठा सहभाग व वाटा असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.























