नंदेश्वर (प्रतिनिधी)
नंदेश्वर गावासह मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गायरान जमिनीवर राहणाऱ्या गोरगरीब लोकांना घरकुले मंजूर झाली आहेत. पण त्यांना घरकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने परवानगी मिळत नसल्याच्या मुख्य प्रश्नासह गोरगरीब लोकांच्या अनेक प्रश्नांसाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे आणि सोलापूर जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सर्व प्रश्न मांडणार असल्याचे प्रतिपादन मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना गडदे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील गोरगरीब लोक गेल्या ३० ते ४० वर्षांपासून गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहेत. शासनाच्या वतीने अनेकवेळा गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना त्यांचे अतिक्रमण नियमित करून देऊ अशी आश्वासने देण्यात आली आहेत. तसेच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अतिक्रमण करणाऱ्या लोकांना जागा देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
पण प्रत्यक्षात या सर्व लोकांना आता घरकुले मंजूर झाली आहेत. पण ग्रामपंचायतीच्या वतीने या सर्व लोकांना घरकुल बांधण्याची परवानगी मिळत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. इतकेच नाही तर काही दिवसांखाली या सर्व लोकांना अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात देखील ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या होत्या. एकीकडे शासनाच्या वतीने अतिक्रमणे नियमित करून देण्याच्या वल्गना होत आहेत.

तर दुसरीकडे तेच शासन ग्रामपंचायतींना अतिक्रमण केलेल्या लोकांचे अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यास सांगत आहे. गेल्या काही दिवसांखाली सर्व अतिक्रमणधारक आणि घरकुल लाभार्थी लोकांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मागवले गेले होते. पण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एकत्रित प्लॉट स्कीम द्वारे सर्व अतिक्रमण धारकांना जिथे ते गेल्या ३० ते ४० वर्षांपासून राहत आहेत तिथे जागा न देता इतर ठिकाणी एकत्रित जागा देण्याचा प्रस्ताव समोर आणला आहे. पण या लोकांना जिथे ते राहत आहे तर तिथेच जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे या सर्व प्रश्नांसाठी आम्ही लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे या सर्व समस्या मांडणार आहोत असे यावेळी बोलताना गडदे म्हणाले.























