नंदेश्वर/ प्रतिनिधी
समाजातील सर्व स्तरातील लोक एका ठिकाणी एकत्रित येण्यासाठी गणेशोत्सव सुरू करण्यात आला होता. पण अलीकडच्या काळात गणेशोत्सव हा धागडधिंगा बनला आहे. अनेक गावातील अनेक मंडळी एक-दोन वर्ष फारतर चार-पाच वर्ष गणेशोत्सव करत पुन्हा बंद करताना दिसत आहेत. पण सलग २६ वर्षे कार्यक्रमांमधील दर्जेदारपणा टिकवत गणेशोत्सव साजरा करत नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथील श्री माऊली गणेशोत्सव मंडळ कुंभार गल्ली यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे मत नंदेश्वर गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.रोहन मेटकरी महाराज यांनी व्यक्त केले.

नंदेश्वर येथे श्री माऊली गणेशोत्सव मंडळ कुंभार गल्ली यांनी रोहन महाराज मेटकरी यांचे कीर्तन आयोजित केले होते. यावेळी मेटकरी महाराज बोलत होते. यावेळी सायंकाळची आरती युवक नेते जयसिंग कांबळे यांचे हस्ते करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य माऊली बंडगर, मनसेचे तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब रामगडे, चैतन्य लाड, बाळू हजारे, संजय टेकनर, उमेश क्षिरसागर, प्रकाश क्षीरसागर यांचेसह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना मेटकरी महाराज म्हणाले की, परमार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्यांच्या कल्याणाची चिंता करणे आणि इतरांच्या भल्यासाठी कार्य करणे. यात स्वतःच्या वृत्तीत शांतता आणणे, रागावर नियंत्रण मिळवणे, वासना कमी करणे आणि स्वभावातील अहंकार दूर करणे यांचा समावेश होतो, असे एका दृष्टिकोनातून सांगितले जाते. थोडक्यात, ‘परमार्थ’ ही एक अशी संकल्पना आहे जी इतरांबद्दल सहानुभूती आणि निस्वार्थ सेवा करण्यावर भर देते.























