मंगळवेढा (प्रतिनिधी): मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस मुंबई विरार पूर्व भागातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यातील पिडीता ही मुळची मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील असून त्यांचे कुटुंबीय हे व्यवसायानिमित्त राज्यभर फिरत असतात. मागील आठ महिन्यापासून ते कुटुंबीय मुंबई येथील विरार पूर्व भागात झोपडी मारून रहावयास होते.

दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान पिडीत मुलीचे वडील व आई हे व्यवसायानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी पिडीता ही घरीच होती. आई वडील दुपारी १.३० वा. परत घरी आले त्यावेळी सदरची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी दिसून आली नाही. तीचा आजूबाजूला सर्वत्र शोध घेवूनही ती मिळाली नसल्याने तीचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय मंगळवेढा तालुक्यातील मूळ गावी येवून शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे सदर कुटुंबियांना खात्री पटली की कोणीतरी अज्ञात इसमाने कोणते तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असल्याचे पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.






















