पंढरपूर (प्रतिनिधी)
सहा ते सात युवक हातात कोयती घेऊन येतात, आणि खुन्नसाने बघतोस काय, असे म्हणत सपासप अल्पवयीन तरुणावर वार करतात, हे चित्र हे बिहारमधील नसून, तीर्थक्षेत्र पंढरी नगरीतील आहे. अशा प्रकारचे कोयते हल्ले, आठ दिवसात तीनदा झाले आहेत.विशेष म्हणजे कोयते हातात घेणारे युवक सर्वच अल्पवयीन आहेत. यामुळे तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे. नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पंढरीत सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांची नियुक्ती झाली असली तरीही, त्यांचा म्हणावा इतका प्रभाव येथील पोलिसांवर आणि परिस्थितीवर नसल्याचे दिसत आहे.

पंढरपूर शहरातील कालिका देवी चौकात रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तांबोळी नामक अल्पवयीन युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. सहा ते सात युवकांनी त्याला घेरून त्याच्यावर सपासप कोयत्याने वार केले.रस्त्यावरील नागरिकांनी मध्यस्थी केल्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले. तरीही या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यास येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.आठच दिवसांपूर्वी शहरातील जुनी पेठ येथे कोयत्याने हल्ला झाला होता, त्याचा तपास होतो न होतो तोच, पुन्हा संत गजानन महाराज मठासमोर युवकावर कोयत्याने वार करण्यात आले.यानंतर दुसऱ्याच दिवशी, पुन्हा कोयती बाहेर निघली, आणि यात तांबोळी नामक युवक गंभीर जखमी झाला. आठ दिवसात तीनदा कोयता गँगने, आपला प्रभाव दाखवला.
बुधवारी श्रीगणेशाचे आगमन होत आहे. यानिमित्ताने खरेदीसाठी पंढरपूर शहरात गर्दी होऊ लागली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर होत असलेल्या या कोयता हल्लूयामुळे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गणेश उत्सवानिमित्त पंढरपूर शहरात शांतता कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीचे कोणतेही काम सध्यातरी दिसत नाही, ती फक्त कागदावरच अधोरेखित झाली आहे.

पंढरी नगरी ही तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी दररोज हजारो भाविक येत असतात. या भाविकांना येथील गुन्हेगारी जगताचा त्रास होऊ नये, अशी भावना येथील नागरिकांमध्ये आहे. पंढरपूर शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, परंतु अद्याप तरी मोठ्या गुन्ह्यात या कॅमेऱ्यांचा वापर झाल्याचे दिसून आले नाही. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी पोहोचण्याची गरज असताना, तसे झाल्याचेही दिसत नाही.पंढरपूर शहर आणि तालुक्यात चालणाऱ्या सावकारकी, वाळू तस्करी, जुगार अड्डे यामुळे येथे तरुणांच्या हातात रगड पैसा येत आहे. परिणामी स्पर्धा होऊन गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. परंतु या गुन्हेगारीवर येथील पोलिसांचा वचक असल्याचे दिसून येत नाही. यामुळेच आठ दिवसात तीन वेळा कोयता गँग सक्रिय झाली असल्याचे दिसत आहे.

* नागरिकांना हवं आहे शांत पंढरपूर *
विठुरायाची नगरी म्हणून प्रसिद्ध असणारे पंढरपूर शहर, येथे दररोज टाळ, मृदंग आणि हरिनामाचा गजर होतो. हजारो भाविक दररोज दर्शनासाठी पंढरीत येतात. ही पंढरी नगरी अगदी शांत असावी यासाठी येथील पोलिसांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या भुरट्या कोयता गैंगचा समाचार घेऊन पोलिसांनी येथील वातावरण शांत करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.




















