सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क : राज्यातील १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानुसार आजपासून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. जिल्हा परिषदांचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान असेल. दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २७ जानेवारी असून, त्याच दिवशी दुपारी साडेतीननंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील. मतदान ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी केली जाणार आहे.
बारा जिल्हा परिषदांमध्ये होणार मतदान
या टप्प्यात लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांच्या तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रशासनानेही निवडणूक प्रक्रियेच्या तयारीला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय यंत्रणा व राजकीय पक्षांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे नियंत्रण राहणार आहे.























