(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
गेल्या तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, या निवडणुका आता 31 जानेवारी 2026 पर्यंत लांबवण्यात आल्या आहेत.

हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिकांवर सुनावणी करताना दिला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यकाळ संपूनही निवडणुका न झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणींचा विचार करून कोर्टाने ही मुदतवाढ दिली आहे.
राज्यातील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका कोविड काळात तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वारंवार लांबवण्यात आल्या होत्या. परिणामी, या संस्था सध्या प्रशासकांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत.

आता निवडणुका कधी?
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 2026 च्या सुरुवातीला, म्हणजेच जानेवारी महिन्यानंतर घेण्यात येतील. त्यासाठी निवडणूक आयोगाला आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही पक्षांनी या निर्णयाचे स्वागत करत स्थिरतेचे समर्थन केले असले तरी विरोधकांनी या मुदतवाढीवर टीका करत लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाल्याचा आरोप केला आहे.
या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताबदलासाठी जनतेला आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. या काळात प्रशासन कसे कार्य करते आणि पुढील निवडणुकीसाठी कसा माहोल तयार होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




















