मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, चाऱ्याची टंचाईही दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पीक जवळपास हातातून गेले आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाने आवश्यक उपाययोजना व तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी केली आहे.

तालुक्यात पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पिकांना आवश्यक वेळी पाऊस न मिळाल्याने उत्पादनात मोठी घट झाली असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. रब्बी हंगामासाठी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी करणेही अनेक शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. ज्या ठिकाणी पेरणी झाली, तेथेही पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध न झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. नागरिकांना पाण्यासाठी दूरवर जावे लागत असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. विहिरी, बोअरवेल तसेच तलावांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
दुष्काळाच्या झळा विद्यार्थ्यांनाही
दुष्काळाचा फटका केवळ शेती आणि पशुधनालाच बसला नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा परिणाम सहन करावा लागत आहे. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य, प्रवास, फी आणि इतर खर्चाचा वाढता भार पालकांना सोसणे कठीण होत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.
चाऱ्याची टंचाई; पशुपालक चिंतेत
पावसाअभावी चारा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनावरांना पुरेसा हिरवा व कोरडा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. चाऱ्याचे दर वाढत असल्याने जनावरे सांभाळणेही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे. शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शेतमजुरांच्या हाताला काम नाही
शेतीची कामे ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील शेतमजूर व रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाने तातडीने दखल घेण्याची गरज
दुष्काळामुळे शेतकरी, पशुपालक, शेतमजूर आणि ग्रामीण कुटुंबांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी शासनाने मंगळवेढा तालुक्याचा वस्तुनिष्ठ पद्धतीने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी केली आहे.
शासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी पाणी व चारा, रोजगार हमीची कामे, पीक नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक मदत जाहीर करावी. दुष्काळाच्या संकटातून तालुक्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने कागदी घोषणांपेक्षा प्रत्यक्ष उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणीही ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी केली आहे.























