नंदेश्वर / प्रतिनिधी : आपली संगत कोणासोबत आहे आणि आपले सल्लागार कोण आहेत, यावर मनुष्याच्या जीवनाची दिशा व भवितव्य अवलंबून असते. चांगली संगत आणि योग्य मार्गदर्शन माणसाला जीवनात योग्य वाटचाल करण्यास प्रेरणा देते. वाईट संगत माणसाला चुकीच्या मार्गावर नेते, तर सत्संग आणि संतांच्या विचारांमुळे जीवनात सकारात्मक बदल घडतो. योग्य सल्लागार आणि मार्गदर्शक मिळाल्यास निर्णयक्षमता वाढते आणि जीवन अधिक सुसंस्कृत व यशस्वी होते. असे प्रतिपादन नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांनी केले. कै. बाबा शंकर सलगर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त नंदेश्वर येथे आयोजित प्रवचन सेवेत ते बोलत होते. कै. बाबा शंकर सलगर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त नंदेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
पुण्यस्मरण दिनानिमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. बाळासाहेब खडतरे महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी कै. बाबा सलगर यांच्या जीवनकार्याला उजाळा देत आध्यात्मिक विचार मांडले. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १२ या वेळेत श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती स.स. बाळासाहेब महाराज यांचे प्रवचन झाले. दुपारी १२ वाजता भजनाचा कार्यक्रम पार पडला. भजनाच्या माध्यमातून उपस्थित भाविकांनी भक्तिरसाचा आनंद घेतला. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
कै. बाबा शंकर सलगर यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या पुण्यस्मरण सोहळ्यास नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व तसेच नातेवाईक, ग्रामस्थ, भाविक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलगर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल दिनेश सलगर, विश्वमाऊली दूध संकलन केंद्राचे चेअरमन दामाजी सलगर व परिवाराने उपस्थितांचे आभार मानले























