नंदेश्वर / बाबासाहेब सासणे
सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, शेतीबरोबरच शेतकऱ्यांचा आधार ठरलेला दुग्ध व्यवसायही अडचणीत सापडला आहे. जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध नसणे, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि वाढता खर्च यामुळे दुष्काळी भागातील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे.

मंगळवेढा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. अल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिकांवर सातत्याने संकट येत असते. त्यामुळे या भागातील अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी वर्षानुवर्षे ऊसतोड मजुरीवर अवलंबून राहावे लागले आहे. गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न म्हणून दुष्काळी भागातील अनेक शेतकरी व शिक्षित तरुणांनी ऊसतोडीला पर्याय शोधला. कमी पावसाच्या परिस्थितीत शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करण्यात आला. घरच्या उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून गायी-म्हशी पाळणे, दूध संकलन केंद्रांना दूध देणे आणि त्यातून नियमित उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न अनेक कुटुंबांनी केला.

दुग्ध व्यवसायामुळे रोजच्या रोज मिळणाऱ्या उत्पन्नाचा आधार मिळू लागल्याने अनेक कुटुंबांना ऊसतोडीसाठी परजिल्ह्यात किंवा परराज्यात स्थलांतर करण्याची गरज कमी झाली. शिक्षित तरुणांनीही पारंपरिक ऊसतोड मजुरीऐवजी गावातच राहून शेती आणि दुग्ध व्यवसाय करण्याचा मार्ग स्वीकारला. मात्र पाऊसच गायब झाल्यामुळे शेतातील हिरवा चारा उपलब्ध झालेला नाही. दुसरीकडे, पाण्याचे स्रोत आटल्याने जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे.
चारा आणि पाण्याच्या वाढत्या खर्चामुळे दुग्ध व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दूध उत्पादन कमी होत असताना जनावरांच्या संगोपनाचा खर्च मात्र वाढत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. काही पशुपालकांसमोर जनावरे विकण्याची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे.
जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या किंवा चाराडेपो उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, पशुधनासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देणे तसेच शेतकरी व पशुपालकांना शासनाच्या दुष्काळी सवलतींचा लाभ देणे आवश्यक आहे. दुष्काळ हा केवळ शेतीचा प्रश्न नसून तो शेतकरी, पशुपालक, मजूर, तरुण आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची वाट न पाहता शासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा दुष्काळी भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
ऊसतोड बंद केलेल्या तरुणांवर पुन्हा ऊसतोडीची वेळ?
दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी येथील अनेक तरुणांनी ऊसतोडीचे जीवन मागे सोडण्याचा प्रयत्न केला होता. शिक्षण घेऊन गावातच रोजगार निर्माण करण्याची धडपड सुरू होती. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न या तरुणांनी पाहिले. परंतु पावसाअभावी दुग्ध व्यवसायच संकटात आल्याने आता पुन्हा ऊसतोडीसाठी बाहेर जाण्याची वेळ येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे गावात रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न आणि दुसरीकडे नैसर्गिक संकटामुळे पुन्हा स्थलांतराची वेळ—या दुष्टचक्रामुळे दुष्काळी भागातील तरुणांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.























