मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावात आज हृदयद्रावक घटना घडली. आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर अचानक काळाने झडप घातली आणि साठवण तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत वैशाली अनिल घोडके (वय 35), श्रेया अनिल घोडके (वय 12) आणि सोहम अनिल घोडके (वय 10) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, वैशाली घोडके आपल्या दोन्ही मुलांसह गावाजवळील साठवण तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंढरपुरातील रेस्क्यू टीम बोलावून घेऊन मृतदेह शोधले
घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, आई वैशाली घोडके यांचा मृतदेह हाती लागला असून, दोन्ही मुलांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता पंढरपुरातील रेस्क्यू टीम बोलावून घेऊन दोन्ही मुलांचा मृतदेह शोधून काढण्यात आला. तिन्ही मृतदेह मिळाल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
या घटनेमुळे खडकी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबातील तिघांवर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे गावावर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र दुःख व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना साठवण तलाव, विहिरी व खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.






















