प्रेयसीला अटक तीन दिवसांची पोलीस कोठडी, उपसरपंचाचा हकणाक गेला जीव
टीम सोलापूर आजतक :
प्रेयसी नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंग आणि खोट्या गुन्ह्याच्या धमकीला कंटाळून उपसरपंचाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ९ सप्टेंबर रोजी घडला. प्रेयसीने घर आणि शेतजमिनीसाठी तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने त्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन प्रेयसीला अटकही केली आहे; परंतु त्याआधी तिने उपसरपंचाशी ओळख करून ‘मी तुमची मालकीण म्हणून काम करते, तुम्ही माझा घरखर्च आणि घरसंसार पाहायचा’ असे सांगितल्याचे समोर आले आहे.

लुखामसला (जि.बिड) गावाचे माजी उपसरपंच आणि ठेकेदार गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४) यांची २० महिन्यांपूर्वी पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रातील नर्तिका पूजा देवीदास गायकवाड (वय २१) हिच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. यावेळी पूजाने गोविंदकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. गोविंदने पूजासाठी आणि तिच्या नातेवाइकांसाठी वेळोवेळी पैसे, सोन्याचे दागिने दिले; तसेच तिच्या भावासाठी महागडा मोबाइल व बुलेट गाडी घेतली, तिच्या आईसाठी सासुरे येथे घराचे बांधकाम करून दिले. मावशीसाठी वैराग येथे प्लॉट घेतला आणि नातेवाइकांच्या नावावर तीन एकर शेती घेऊन दिली होती. तरीही तिची अपेक्षा कमी झाली नव्हती. यामुळे तणावाखाली असलेल्या बर्गे यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी गोविंदचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी पूजा गायकवाड हिच्या विरोधात वैराग (जि. सोलापूर) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पूजाला अटकही केली आहे.
पूजाच्या आईच्या घरासमोर जाऊन व्हिडीओ कॉल….
मानसिक त्रासाला कंटाळून गोविंदने ८ सप्टेंबर रोजी पूजासोबतचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; पण तिने नकार दिला. त्यानंतर त्याने पूजाच्या आईच्या घरासमोर जाऊन व्हिडीओ कॉलवर आत्महत्या करणार असल्याचे दाखवले; पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.अखेर ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्याने स्वतःच्या काळ्या रंगाच्या कारमध्ये आतून लॉक करत डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
दोन वेळा मेहुण्यालाही सांगितले होते…
गोविंद यांच्या पत्नीचे भाऊ लक्ष्मण चव्हाण यांनाही या त्रासाबद्दल त्यांनी दोन वेळा सांगितले होते. तसेच कला केंद्रात सोबत राहणारा मित्र चंद्रकांत शिंदे यांनाही हा प्रकार माहिती होता. त्यांनी समजावल्यानंतर पूजाच्या आहारी गेलेल्या गोविंद यांनी जीवन संपविले.वाढदिवसाआधी हवा होता गेवराईचा बंगला
गेवराईत बांधलेला मोठा बंगला १ पाहून पूजाने तो तिच्या नावावर करण्यासाठी तगादा लावला. गोविंदने नकार दिल्यावर तिने त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली. वाढदिवसाच्या १५ दिवसांपूर्वी तिने अल्टिमेटम दिला की, ‘गेवराईतील २ घर माझ्या नावावर कर किंवा माझ्या भावासाठी ५ एकर शेती घेऊन दे. नाहीतर मी तुझ्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करेन.’ यालाच गोविंद हे वैतागले होते.




















