पंढरपूर / तालुका प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडलेल्या एका संशयित मृत्यू प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित आरोपीस तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी लोहार समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मृत समाधान गणपत कावरे यांच्या संशयित मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विश्वकर्मा लोहार विकास संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब कळसाईत, सोलापूर लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष महेश लोहार आणि लोहार सेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी लोहार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १० जानेवारी २०२६ रोजी उंबरगाव येथे समाधान कावरे यांच्या घरी पिण्याच्या पाण्यात जबरदस्तीने औषध मिसळून ते पाणी पिण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेला एक महिना उलटून गेला असला तरी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे यांच्याकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप लोहार समाज संघटनेने केला आहे.
संबंधित प्रकरणात अद्याप एफआयआर नोंदविण्यात आलेला नाही. तसेच डॉक्टरांचा अहवाल येण्यासाठी सहा महिने लागू शकतात, तोपर्यंत कारवाई शक्य नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे न्याय प्रक्रियेला विलंब होत असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला.
मृत समाधान कावरे यांना न्याय मिळावा, दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी तसेच पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेले जबाब पुन्हा नोंदवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पंढरपूर समोर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने लोहार समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढगळे लोहार समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रकरणाची लवकरात लवकर सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत आश्वासन दिले. त्यानंतर लोहार समाजाने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.























