नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच गावातील राजकीय वातावरण तापू लागले असून, यंदाची निवडणूक चुरशीची आणि वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या गावात प्रत्येक चौकात, कट्ट्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.

सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची विविध प्रभागांमध्ये उमेदवारांची चाचपणी
नंदेश्वर ग्रामपंचायतीचा सरपंच पहिल्यांदाच जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी ग्रामपंचायतीच्या विविध प्रभागांमध्ये संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून, अनेक इच्छुकांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही जण उघडपणे निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे, तर काहींनी शांतपणे, गनिमी काव्याने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत काही ठिकाणी थेट दुरंगी लढत होण्याची शक्यता असली, तरी काही प्रभागांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी संघर्ष पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगत आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपली ताकद वाढवण्यासाठी मतदारांशी संपर्क साधत असून, सामाजिक कार्यक्रम, बैठका आणि गाठीभेटींचे प्रमाण वाढले आहे.

मतदारही यंदा विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या तयारीत
गावाच्या विकासाच्या मुद्द्यांवरही चर्चा सुरू असून, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व मूलभूत सुविधा हे मुद्दे यंदाच्या निवडणुकीत केंद्रस्थानी राहतील, अशी शक्यता आहे. मतदारही यंदा विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.एकूणच, नंदेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक केवळ औपचारिक न राहता राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत राजकीय हालचाली अधिक वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत.






















