सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी ३० जून २०२६ पासून पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबर २०२१ मध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली होती. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील १०३० ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती, ग्रामसभेच्या सूचना, पाणीपुरवठ्याबाबत तातडीच्या सूचना, घरपट्टी-पाणीपट्टी भरण्याबाबत सूचना तसेच पूर, भूकंप, वणवा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची माहिती देण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरत होती.

या यंत्रणेअंतर्गत टोलफ्री क्रमांक 18002703600 वरून केलेला कॉल गावातील सर्व नागरिकांच्या मोबाईलवर एकाच वेळी तत्काळ पोहोचत होता. सध्या सोलापूर ग्रामीण भागातील तब्बल ११ लाख ७० हजार ५०० ग्रामस्थ या यंत्रणेशी जोडलेले असून, आजपर्यंत २१ हजार ६०० पेक्षा अधिक वेळा या सुविधेचा वापर करण्यात आला आहे.

ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये यश मिळाले आहे. ऊस आगीपासून शेकडो एकर क्षेत्र वाचवणे, हरवलेली मुले शोधणे, अपहरण प्रकरणातील आरोपींना पकडणे, चोरी व दरोड्यांतील आरोपींना जेरबंद करणे तसेच विषबाधेसारख्या गंभीर घटना टाळण्यात या यंत्रणेची मोठी मदत झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयानेही पूर परिस्थिती हाताळण्यासाठी या यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर सूचना मिळून अनेक दुर्घटनांमध्ये तातडीने मदत पोहोचली. मात्र, ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक निधी ग्रामपंचायतींकडून उपलब्ध होत नसल्याने आणि जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबत ठोस प्रयत्न न झाल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.























