मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आर्थिक महामंडळाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोहार समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच समाजाच्या विविध प्रश्नांना अधोरेखित करण्यासाठी एक भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती आणि महाराष्ट्रातील विविध लोहार समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता दादर (पूर्व), मुंबई येथील वसंतस्मृती, भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पार पडणार आहे.

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री राहणार उपस्थित
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर मंत्री व पक्षाचे नेते उपस्थित राहून लोहार समाजाशी संवाद साधणार आहेत. प्रमुख अतिथींमध्ये चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री), आशिष शेलार (सांस्कृतिक कला मंत्री), मंगल प्रभात लोढा (कौशल्य विकास मंत्री) यांचा समावेश आहे. तसेच राजेंद्र चव्हाण, अमित साटम आणि निहारिका खोंडले यांसारखे मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

शासन आणि समाज यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यासाठी कार्यक्रम
या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लोहार समाजाच्या विविध समस्या आणि विकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या ३२ महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन मंत्रीमंडळास सादर करण्यात येणार आहे. शिक्षण, रोजगार, उद्योगधंदे, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांतील प्रश्नांचा या मागण्यांमध्ये समावेश असल्याचे समजते. समाजाच्या प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळामुळे लोहार समाजातील युवकांना स्वावलंबनाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शासन आणि समाज यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

राज्यभरातून लोहार समाज मोठ्या संख्येने राहणार उपस्थित
या भव्य सोहळ्याला राज्यभरातून लोहार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. समाजाच्या एकजुटीचे आणि संघटित शक्तीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम भविष्यातील विकासाचा मार्ग निश्चित करणारा ठरेल, असे मतही व्यक्त करण्यात येत आहे. समाजातील सर्व बंधू-भगिनींनी सहपरिवार उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




















