मंगळवेढा / प्रतिनिधी : राज्यातील गोरगरीब कष्टकरी मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तीव्र संताप व्यक्त करत राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी यांनी कठोर इशारा दिला आहे. अशा प्रकारचे हल्ले तात्काळ थांबवले नाहीत, तर संबंधितांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नुकत्याच घडलेल्या घटनेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात मेंढपाळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मेंढपाळ करणाऱ्या महिलांनाही लक्ष्य करण्यात आले असून त्यांच्यावर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दामाजी मेटकरी यांनी सांगितले की, केवळ सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मेंढपाळ समाजावर अशा प्रकारचे हल्ले वाढत चालले आहेत. हे प्रकार अत्यंत निषेधार्ह असून शासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. मेंढपाळ समाज हा कष्टकरी व दुर्बल घटक असून त्यांच्यावर होणारे अन्याय थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, प्रशासनाने दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि पीडितांना न्याय द्यावा, अन्यथा समाजातील संताप उफाळून येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या घटनेमुळे मेंढपाळ समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्य नागरिकांकडूनही मागणी होत आहे.




















