मानवाचा उद्धार होण्यासाठी संत संगती अत्यंत महत्त्वाची आहे – बाळासाहेब महाराज
नंदेश्वर येथे कै. बाबा सलगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
नंदेश्वर /प्रतिनिधी
महाभारतामध्ये पांडवांपेक्षा कौरवांची संख्या कितीतरी पटीने जास्त होती पण पांडवांना फक्त कृष्णाची साथसंगत लाभली होती त्यामुळे कमी संख्या असताना देखील पांडवानी कौरवांवर विजय मिळवला. सध्य स्थितीला लोकांचा परमार्थाकडे ओढा कमी होत चालला आहे. पण काहीही झाले तरी मानवाचा उद्धार होण्यासाठी संत संगती खूप महत्त्वाची आहे असे प्रतिपादन नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांनी केले. नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे कै.बाबा सलगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित प्रवचन सेवेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब म्हणाले की, अलीकडच्या काळात समाजात वावरत असताना अत्यंत हुशारीने राहणे गरजेचे आहे. कारण समाजात सध्या सल्ला देऊन गार करणारे अनेक सल्लागार आहेत. अशा सल्ल्यांपेक्षा भगवंताच्या चरणी लीन झाल्यास आपोआप मार्ग सापडतील असेही यावेळी बोलताना बाळासाहेब महाराज म्हणाले. यावेळी दिनेश सलगर, विश्वमाऊली दूध संकलन केंद्राचे चेअरमन दामाजी सलगर, डॉ. पांडुरंग सलगर हे उपस्थित होते.
कै. बाबा सलगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दिनांक 30 आणि गुरुवार दिनांक 31 या दोन दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बुधवारी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यानंतर गुरुवार दिनांक ३१ रोजी सकाळी नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण भजनी मंडळाचे सुस्राव्य असे संगीत भजन संपन्न झाले. सकाळी ११ ते १२ या वेळेत बाळासाहेब महाराज यांची प्रवचन सेवा संपन्न झाली. यानंतर दुपारी ठीक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
********************
* कै.बाबा सलगर असाधारण व्यक्तिमत्व
कमी शिक्षण होऊन सुद्धा प्रत्येक क्षेत्रातील सखोल ज्ञान असणारे कै. बाबा सलगर हे अत्यंत संयमी, प्रेमळ आणि असाधारण व्यक्तिमत्व होते. इतकेच नाही तर स्वतः कमी शिक्षण घेतलेले असताना सुद्धा मुलांना उच्चशिक्षित करून त्यांनी एक समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला होता असे गौरवोद्गार यावेळी बाळासाहेब महाराज यांनी काढले.























