नंदेश्वर / प्रतिनिधी : खुपसंगी-आंधळगाव हद्दीवरील वनिकरण क्षेत्रात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीत अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे जळून खाक झाली असून उरलेली झाडे वाचवण्यासाठी तातडीने पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026 मध्ये सहभागी झालेल्या श्री कामसिद्ध शेडनेट शेती शेतकरी गट, खुपसंगी यांच्या वतीने जळालेल्या झाडांना जीवनदान देण्यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
२५ एकरातील झाडांना आळी तयार करून दिले पाणी
गटाच्या सदस्यांनी सुमारे 10 हेक्टर क्षेत्रातील झाडांना आळी करून टँकरद्वारे पाणी घालण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही आदेशाची वाट न पाहता निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “आज झाडांना पाणी घातले तर उद्या हीच झाडे आपल्याला सावली, शुद्ध हवा आणि सुरक्षित पर्यावरण देणार आहेत,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आगीत जळालेल्या झाडांना नवजीवन
या उपक्रमामुळे जळालेल्या झाडांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली असून परिसरात पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेशही दिला जात आहे. “झाडे वाचवा – झाडे जगवा”, “आजचे पाणी, उद्याचे हिरवे भविष्य” अशा घोषणांद्वारे ग्रामस्थ व तरुणांना निसर्गरक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. गटाच्या वतीने सर्व नागरिक, तरुण मित्र व निसर्गप्रेमींना अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकल्यास भविष्यातील पर्यावरणीय संकटांवर मात करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी गटाचे अध्यक्ष दिनेश लेंगरे, सचिव विनोद बंडगर, निमंत्रक बापू शेळके, माजी सरपंच कुशाबा पडवळे, राजकुमार चौगुले, दत्ता शेजाळ, सुरेश लेंगरे, पांडू टकले, समाधान शेळके, विकास लवटे, अविनाश माळी, नवनाथ बंडगर, विजय शेळके, रामचंद्र तांबे आदी उपस्थित होते.






















