नंदेश्वर | प्रतिनिधी : धनगर समाजाच्या भविष्यासाठी आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून पुढील पिढ्यांचा विचार करून समाजातील सर्व नेते, कार्यकर्ते आणि बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नंदेश्वर येथील अभिमान शिंदे आणि अंकुश केरप्पा गरंडे यांनी केले. येत्या २१ तारखेला मुंबई येथे धनगर आरक्षणासाठी मोठे आंदोलन होणार असून या आंदोलनाचे नेतृत्व धनगर आरक्षणाचे नायक दीपक बोराडे करणार आहेत. या ऐतिहासिक आंदोलनात सर्वांनी मतभेद विसरून सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
धनगर समाज आजही शिक्षण, नोकरी, आरोग्य आणि विकासाच्या अनेक संधींपासून वंचित आहे. आरक्षणाच्या अभावामुळे समाजातील तरुण पिढीसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा केवळ आजचा नसून भविष्यातील पिढ्यांच्या प्रगतीशी थेट जोडलेला असल्याचे शिंदे आणि गरंडे यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, समाजातील अंतर्गत मतभेद, वैयक्तिक मतभिन्नता बाजूला ठेवून एकसंघपणे आंदोलनात सहभागी होणे ही काळाची गरज आहे. एकजुटीचे सामर्थ्य दाखवले तरच शासनाचे लक्ष या ज्वलंत प्रश्नाकडे वेधले जाईल.
मुंबईत होणारे हे आंदोलन शांततेच्या मार्गाने, शिस्तबद्ध आणि लोकशाही पद्धतीने पार पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आंदोलनातून धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ठोस भूमिका मांडली जाणार असून शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. धनगर समाजातील सर्व संघटना, कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने मुंबईत उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन शेवटी अभिमान शिंदे आणि अंकुश केरप्पा गरंडे यांनी केले.























