मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरलेले भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून अखेर माघार घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले असून, तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्यासाठी अनिल सावंत यांच्यावर कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह होता. भैरवनाथ शुगर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात राबवलेली विकासकामे, शेतकरीहिताची भूमिका आणि संघटन कौशल्य यामुळे ते एक मजबूत उमेदवार मानले जात होते. मात्र, भोसे गटात महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले होते.
दरम्यान, भोसे गटातील उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने अनिल सावंत यांना हुलजंती जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्याची जोरदार मागणी पुढे आली. हुलजंती गटातील अनेक नेते, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना थेट भेटून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. विशेष म्हणजे भगीरथ भालके यांच्यासह हुलजंती गटातील अनेक दिग्गज नेते या मागणीसाठी ठाम होते.
सर्व परिस्थिती अनुकूल असतानाही अनिल सावंत यांनी “जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे” असे सांगत या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, काही ठिकाणी उघडपणे संताप व्यक्त केला जात आहे. “नेतृत्वाची गरज असताना सावंत यांनी माघार घेणे योग्य नाही,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
अनिल सावंत यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारी समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता असून, दोन्ही गटांतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात कार्यकर्त्यांची नाराजी कशी शांत केली जाते आणि सावंत पुढील राजकीय भूमिका काय घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.























