भोसे / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण ही निवडणूक लढवीत असल्याचे प्रतिपादन सिद्धेश्वर रणे यांनी केले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मोकळी आश्वासने न देता मूलभूत प्रश्न सोडविण्यावर भर
यावेळी बोलताना सिद्धेश्वर रणे म्हणाले की, भोसे जिल्हा परिषद गटातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून वीज, पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कमतरतेला सामोरे जावे लागत आहे. हे प्रश्न आजही जैसेच्या तसे उभे असून, त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. फक्त निवडणुकीपुरती आश्वासने देऊन प्रश्न सुटत नाहीत, तर त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत.
“इतर उमेदवारांप्रमाणे केवळ मोकळी आश्वासने देण्यापेक्षा या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या प्रत्यक्षात समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबात जन्म घेतल्यामुळे सर्व प्रश्नांची जाण
आपल्या सामाजिक पार्श्वभूमीचा उल्लेख करताना रणे म्हणाले की, आपण एका मेंढपाळ कुटुंबात जन्मलो असल्याने ग्रामीण भागातील अडचणी, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. पाणीटंचाई, खराब रस्ते, अपुरी आरोग्यसेवा आणि शिक्षणातील अडथळे या समस्या केवळ कागदावर नाहीत, तर त्या प्रत्यक्ष जीवनाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेने संधी दिल्यास सर्व प्रश्नांना पुरून उरेल – सिद्धेश्वर रणे
या सर्व अडचणी मी स्वतः अनुभवल्या असून त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची माझी तयारी आहे. जनतेने संधी दिल्यास भोसे जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अर्ज दाखल करण्याच्या वेळी त्यांच्या समर्थकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धेश्वर रणे यांच्या या भूमिकेमुळे भोसे जिल्हा परिषद गटातील निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.























