पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांनी राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे पंढरपूर येथे स्वतंत्र मराठी भाषा अध्यासन केंद्र स्थापन करणे आणि नव्याने मंजूर झालेल्या एमआयडीसीमध्ये उद्योग उभारणी करून ती तात्काळ कार्यान्वित करण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले आहे.

स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारणे गरजेचे
बुधवार दि. २७ मे रोजी ना. उदय सामंत हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता अनिल सावंत यांनी त्यांची भेट घेऊन या मागण्या मांडल्या. पंढरपूर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून संत साहित्य, मराठी संस्कृती आणि वारकरी परंपरेचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे येथे मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारल्यास राज्यभरातील अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संत साहित्याचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे व्हावा यासाठी चंद्रभागा नदी घाट परिसर तसेच शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी संतांचे विचार, अभंग आणि प्रेरणादायी संदेश प्रदर्शित करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. मंदिर परिसर, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, प्रमुख चौक आणि सुरक्षा ग्रीलवर अभंगांचे फलक उभारल्यास पंढरपूरच्या सांस्कृतिक वातावरणात अधिक भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मराठी भाषा आणि संत साहित्य संवर्धनासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तसेच संत तुकाराम विद्यापीठ विविध उपक्रम राबवत असले तरी शासनस्तरावर स्वतंत्र मराठी भाषा अध्यासन केंद्राची स्थापना झाल्यास या कार्याला अधिक बळ मिळेल, असेही अनिल सावंत यांनी म्हटले आहे.

लघु उद्योगांना चालना मिळणे गरजेचे अनिल सावंत यांची मागणी
दरम्यान, पंढरपूर येथे नव्याने मंजूर झालेल्या एमआयडीसीचा विषयही त्यांनी यावेळी जोरकसपणे मांडला. धार्मिक पर्यटनावर अवलंबून असलेल्या पंढरपूर परिसरात लघुउद्योगांना चालना मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपुरातील चुरमुरे, बत्तासे, कुंकू, बुक्का, फोटो फ्रेम, दगडी मूर्ती, खेळणी, बांगड्या यांसारख्या पारंपरिक व्यवसायांना एमआयडीसीच्या माध्यमातून बाजारपेठ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. पंढरपूर एमआयडीसी तातडीने सुरू झाल्यास स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. धार्मिक पर्यटनासोबत औद्योगिक विकास घडल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मंगळवेढा एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत
याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्यात रोजगाराच्या संधी अत्यल्प आहेत. त्यामुळे उद्योग उभारणी झाल्यास स्थलांतर कमी होऊन स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळेल व आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






















