माचणुर | विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर हे ‘बाहेरचे उमेदवार’ असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना या आरोपांचा शिरनांदगी गावचे लोकनियुक्त सरपंच गुलाब थोरबोले यांनी खरपूस समाचार घेतला. “मी स्वतः आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात असतानाही प्रदीप खांडेकर यांनी माझ्या गावातील सर्वसामान्यांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय दिला,” अशा स्पष्ट शब्दांत सांगत थोरबोले यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

विरोधात असतानाही प्रदीप खांडेकर यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला दिला न्याय
माचणुर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते तसेच युवक नेते प्रणव परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुलाब थोरबोले बोलत होते. थोरबोले म्हणाले, आज मी आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत काम करतो आहे. मात्र याआधी मी त्यांचा कट्टर विरोधक होतो. अशा परिस्थितीतही प्रदीप खांडेकर हे सभापती असताना माझ्या गावातील कामे घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी कधीही राजकीय भूमिका पाहिली नाही. विरोधक-आपले, परके-आपले असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.
सभापतीपदी असताना खांडेकर यांनी दिला भोसे जिल्हा परिषद गटाला सर्वाधिक निधी
ते पुढे म्हणाले, खांडेकर यांनी त्यांच्या सभापती काळात भोसे जिल्हा परिषद गटासाठी सर्वाधिक निधी आणला आहे. संपूर्ण मंगळवेढा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारा, सर्वांना समान वागणूक देणारा माणूस परका कसा असू शकतो? आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव स्पष्ट दिसू लागल्याने ते दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत. विरोधकांवर अधिक तीव्र शब्दांत टीका करत थोरबोले म्हणाले, “आज जे लोक खांडेकरांना परका म्हणत आहेत, त्यांनी याआधी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे भाजपाची उमेदवारी मागण्यासाठी शंभर माणसे पाठवली होती. याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे आजची त्यांची भूमिका किती दुटप्पी आहे, हे जनतेने ओळखावे.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली…
आमदार समाधान आवताडे यांनी प्रदीप खांडेकर यांना उमेदवारी देताना सर्व बाजूंनी विचार केला असणार. त्यामुळे विरोधकांनी खांडेकरांवर बोलत बसण्यापेक्षा स्वतः कसे निवडून येतील, याचा विचार करावा. जिल्हा परिषद गटासाठी काय करणार आहेत, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहेत, हे जनतेसमोर मांडावे, असे आव्हानही थोरबोलेंनी दिले. या कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांचे उमेदवार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रचाराच्या सुरुवातीलाच झालेल्या या थेट आणि आक्रमक वक्तव्यांमुळे भोसे जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण अधिक तापल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.























